“ती जागा होतीच तशी, कोणीपण ती जागा आली की झपाझप पावले टाकत, तो रस्ता कधी संपतो असे म्हणतच पुढे जात. तस पाहिलं तर गावाच्या मध्यवस्तीत असे भीतीदायक वाटायला नको. पण ठाऊक नाही मध्यवस्तीतल्या ऐसपैस वाड्याला कसली नजर लागली” सीमा सांगत होती.
गावात आपल्या आजोळी आलेल्या यशला हे सारे नवीनच होते. अर्थातच अमेरिकेत वाढलेल्या यशला हे तिने आधी सांगितले असते तर विश्वास बसलाच नसता. मात्र कालच्या घटनेनंतर तोही जरा बिथरला होता.
अंजनीताई म्हणजेच यशची आई. इतक्या वर्षांनी माहेरी आल्या मूळे हरखून गेल्या होत्या. याला भेट, त्याला भेट असे चालू होते त्यांचे आणि काल भेटायला जाताना वाड्यासमोरून गेल्या अन् वापस आल्यापासून, “ती मला बोलावतेय” म्हणून ओरडत होत्या. आता त्यांना बांधून ठेवलेले होते. म्हणूनच आईला यातून बाहेर काढण्यासाठी यश यामागे काय आहे याचा तर्क लावायचा प्रयत्न करत होता.
यश च्या मामेबहिणीने सिमाने दिलेली ही माहिती पुरेशी नव्हती. तेव्हा दोघेजण अजून कोणाला विचारावे म्हणून निघाले घरातून. जरा वयस्कर दिसणाऱ्या सुमित्रा काकू दिसल्या आणि सीमाने त्यांना थांबवले आणि वाड्याबद्दल विचारले, “अगो, पाटलाचा वाडा तो. शापित वाडा म्हणतात हो त्याला. पाटलाच्या कुटुंबाचा घास घेतला वाड्याने अन् आता पाटलाचे कुटुंब गावतल्यांचा घास घेतात”.
“म्हणजे”, यशने विचारले.
“अरे वर्षातून एकाला तरी घेऊन जातो हा वाडा.”
“आत्तापर्यंत कोण कोण गेलंय”, यशने पुढे विचारले.
पाच वर्षात पाच जण गेले पहा. तीन तर पाटलाची गडी माणसे होती, नंतर सावकाराचा मुलगा आणि मागच्या वर्षी ती अक्का नाही का पाटलांच्या घरात फार लुडबुड असायची तिची तिला नेली.
यश विचार करू लागला ज्यांचे जीव गेले ते सगळे गावातले आणि पाटलाची जवळची माणसं. आई तर हे सर्व घडले त्याच्या कितीतरी आधी लग्न होऊन आली होती मग तिला का असे होतेय! अजून खूप ठिकाणी चौकशी केली मात्र हाती काहीच लागले नाही.
अंजनीताईंना गावातून बाहेर नेणें शक्यच नव्हते. घरातून जरी बाहेर न्यायचा प्रयत्न केला तरी त्यांचे होणारे हाल कोणाला बघवत नव्हते. जणू कोणी त्यांना आतून पोखरत आहे.
मामाचे म्हणणे होते, मांत्रिकाला बोलावू. यशला सर्वच गोष्टी अनाकलनीय होत्या त्यामुळे त्याने फारसा विरोध करायचा काहीच प्रश्न नव्हता. मांत्रिक काही करू नाही शकला पण शंकराच्या मंदिरातल्या उदी मुळे मात्र अंजनीताई थोड्या शांत झाल्या.
तसा यश पुन्हा बाहेर पडला. आपोआपच त्याचे पाय मंदिराकडे वळले. एकदम जुनं होत ते मंदिर ठेवढंच शांत. त्याने हात जोडले अन त्याला कोणाचीतरी चाहूल लागली. त्याने वळून पाहिले तर एक मुलगी दूरूनच नमस्कार करत होती. चप्पल घालून उतरे पर्यंत ती दिसेनाशी झाली. यश विचार करू लागला इतक्या लवकर ती कशी कुठे जाऊ शकते. मात्र त्याहीपेक्षा त्याला तिला कोठेतरी पहिल्या सारखे वाटलेले.
तसाच विचार करत तो वाड्याकडे वळला. जर आईला यातून बाहेर काढायचे तर जिथे मूळ तिथेच शोध घ्यावा असे काहीसे ठरवून तो वाड्यापाशी आला. लोक म्हणतात ते खोटे नव्हते. दिवस असूनही वाडा सावलीने झाकून गेल्यासारखा दिसत होता. फार नाही पाच तर वर्ष बंद होता तरीही जीर्ण असा वाटत होता.
खरच पाटलाचे कुटुंब भूत बनून राहत असेल?? यशने विचार झटकला, मंदिरातली उदी लावली आणि गेट उघडले. अन मघाशी दिसलेली मुलगी त्याला विहिरीपाशी उभी दिसली. तो तिकडे जायला निघाला तस त्याला आवाज आला, "मागे फिर". आवाज ऐकून मात्र यश गारठला अन तत्क्षणी मागे परतला. आता त्याला हेही आठवले की तिला कुठे पाहिलेले. पहिल्यांदा गावात आले तेव्हा याच वाड्यासमोरून गाडी गेलेली एक मिनिट गाडी बंद पडली होती यशची नजर जर सभोवती गेली तर गाडीकडे एकटक पाहणारी मुलगी त्याला वाड्या बाहेर दिसली होती. अन तेवढ्यात गाडी पुन्हा सुरू झाली होती.
घरी आल्याआल्या त्याने सीमाला विचारले काय ग पाटलाला मुलगी पण होती का एखादी, लग्न न झालेली मात्र वयाने फार लहान नसावी तिशी-पस्तिशीतली पण सुंदर.
एवढ्या गंभीर वातावरणातही सीमा हसायला लागली. अरे पाटलाची मुलगी लग्न झालेली इथे नसते ती आणि मोठी असेल ती आणखी तस पण ती फार काही सुंदर नव्हती. त्यामुळे तुला जी सुंदर बाई दिसली ती गावतलीच एखादी असेल. कोणालाही भूत बनवतोस आणि काय रे वयाने मोठ्या बायकांकडे काय बघतोस.
यश जरा वरमला, हे बघ माझे लग्न ठरलेला आहे तेही लव्ह मॅरेज. मी फक्त आईला यातून लवकर बाहेर काढण्यासाठीच हे विचारले. तशी सीमा देखील गंभीर झाली आणि शांत बसली.
तुला पाटलांच्या कुटुंबाबद्दल काय काय माहितीय सांगशील, यश म्हणाला तस सीमाने मान हलवली, नाही रे शिक्षणासाठी बाहेर होते फक्त आले की खबरी समजायच्या. तसाच वाड्याबद्दल समजले मात्र बाबांना नक्की माहिती असेल.
दोघेजण मामाकडे गेले. मामांनी सांगितले, पाटील तसा भला माणूस होता. एकुलता एक मुलगा होता त्याला आणि त्याचे लग्न झाले होते. त्याच्या लग्नात अण्णांनी म्हणजेच आजोबांनी फार मदत केली. पण काय ही परतफेड पाटलाची आमच्याच घरातल्यांना त्रास देतोय.
तसे यश चपापला इतके दिवस त्याला पाटलांचे आणि आपल्या फॅमिली चे काही कनेक्शन मिळत नव्हते ते मिळाले होते.
मामा मी इतके दिवस विचारत होतो तेव्हा नाही बोललास काही. तो म्हणाला, आता यात काय सांगण्यासारखे. अरे त्यांना घरगडी बघून देण्यापासुन मदत करायचे अण्णा!
यश चे आजोबा गेली पाच वर्षे झाली अंथरुणाला खिळून होते. वयही झाले होते पण देव बोलवत नाही असे काहीतरी बडबडायचे ते..
तो आजोबांच्या खोली कडे वळला तसे मामा बोलला अरे त्यांचे बोलणे सुद्धा भ्रमिष्टा प्रमाणे असते ते काय सांगणार. तसा यश बोलला प्रयत्न तर करू..
आजोबांपाशी यश बसला, तसे आजोबा म्हणाले बेटा आईला घेऊन शंकराच्या देवळात जा. तोच काहीतरी मार्ग दाखवेल. आजोबांनीच विषय काढल्यामुळे यशला हायसे वाटले.
आजोबा मला जरा पाटलांबद्दल सांगाल. तसे आजोबा बोलू लागले. पोरा या जन्मीचे याच जन्मी फेडावे लागते. पूर्ण कुटुंब गेलं त्याच. पण मग आजोबा आता पाटील दुसर्यांना का त्रास देतोय? गावाने त्याचे काही वाकड केलंत काय? यश बोलला.
तस आजोबा हसले अन असेच बडबडत बसले. “शेवंताला त्रास दिला ती कोणाला नाही ठेवणार’ यापेक्षा जास्त काही समजेना. परवा आईपण शेवंता रडू नको असे म्हणत होती! यशने आजोबांना शांत केले. त्यांच्याशी थोड्या मोकळ्या गप्पा मारल्या आणि शेवंता कोण आहे किंवा तिच्याबद्दल कोण सांगेल असे विचारले. आजोबा पुन्हा अस्वस्थ जाणवू लागले. तरी ते माळ्याची शेवंता असे काहीतरी बडबडलेले यशला लक्षात आले. आजोबांना शांत करून तो बाहेर आला आणि सीमाला म्हणाला गावात माळी कितीयेत ग.
तसे सीमा बोलली, अरे माळी असे कोणी नाही बघ गावात.
यशला समजतच नव्हते की दरवेळेस आता काहीतरी मार्ग सापडेल म्हणले की नवीनच प्रश्न समोर असायचा.
पण एक मात्र होते ती जी काही शक्ती होती तिला यशच्या आईचा जीव नक्कीच घ्यायचा नव्हता. नाहीतर त्या शक्ती साठी हे काही अशक्य नव्हते पण ती त्यांना गावाबाहेर जाऊ नव्हती देत.
यश पुन्हा देवळात गेला. आज त्याने तिथे हात जोडले आणि बोलायला लागला, माझ्या आईला यातून बाहेर काढ. मी यामागे काय होते याचा छडा लावल्याशिवाय नाही जाणार.
अचानक वाऱ्याची झुळूक आली आणि यशचे पलीकडे लक्ष गेले तिकडे तीच ती मुलगी उभी होती. पण यशने तिकडे जायचा मुळीच प्रयत्न केला नाही.
तो सरळ गावच्या छोट्याश्या पोलीस ठाण्यात आला. दुपारची वेळ होती सगळे जेवायला गेले होते फक्त एक हवालदार काका होते. यशने त्यांना पाटील आणि कुटुंबाबद्दल विचारले. त्यांचे कोणाशी वैर होते का हेही विचारले.
हवालदाराने यशची उलटतपासणी केली. पण जेव्हा यश ने सर्व कथन केले तेव्हा ते बोलायला लागले.
पाटील त्याची बायको आणि मुलगा, मुलीचे तर लग्न झाले होते. पाटलाचा मुलगा म्हणजे नारायण. त्याला एक मुलगी आवडायची मात्र प्रतिष्ठेकडे पाहून त्याने दुसरी सोबत लग्न केले.
त्या मुलीने मात्र लग्न नाही केले. पाटीलाला जशी ही गोष्ट समजली तसे त्याने तिच्या घरच्यांवर दबाव आणायला सुरुवात केली. पोरीचा लग्न दुसऱ्या गावात लावून द्या. काय हवं नको ते मी बघतो म्हणायचा. तिच्या वडिलांना त्याने माळी कामाला ठेऊन घेतले आणि तिच्यासाठी मुलं पाहणे सुरू झाले. मात्र सुंदर असली तरी लग्नाचे वय निघून गेले होते तिचे. त्यात नारायण तिला चोरून भेटायचा.
अशातच नारायणची बहीण आणि भाऊजी आले. त्याच्या बहिणीचा नवरा म्हणजे महा चालू. त्यात ही पोरगी त्याच्या मनात भरली. त्याने पाटलाला भरून दिले जोपर्यंत ही आहे तोपर्यंत नारायणाचा संसार आणि तुमची प्रॉपर्टी दोन्ही धोक्यात आहे. पण तुम्ही काळजी करू नका मी काय ते बघून घेतो असे म्हणत तो मनात तिला मिळवायची योजना करू लागला. मात्र जेव्हा ती बधत नाही हे समजले तेव्हा त्याने पाटलाला तिचा काटा काढायची योजना सांगितली. पाटलाने त्याच्या लोकांच्या मदतीने तिचा बंदोबस्त केला.
त्याच्यावर इथे तक्रार पण आली. पण कोर्टात जायच्या आधीच पाटलाचे संपूर्ण कुटुंब एखादा शाप लागल्या प्रमाणे घरात लागलेल्या आगीत जळून संपले. त्यानंतर तर वाड्याची अवस्था तू पाहतोच आहेस.
तुम्हाला काय वाटते असे भूत वैगेरे काही असेल खरच!? यशने विचारले. तसे हवालदार काका म्हणाले, नसेल कदाचित पण ज्यांचे मृत्यू झाले ते सर्व गूढ होते बघ.
ते माळी काका कुठे भेटतील, यश ने पुन्हा विचारले.
ठाऊक नाही कधी दिसले नाहीत नन्तर गावात. एकुलती एक पोर होती रे शेवंता त्यांची.
काय “शेवंता” ! अच्छा म्हणजे नारायणाचे जिच्यावर प्रेम होते ती शेवंता.. यश बोलला, कशी होती दिसायला ही.
काका सांगायला लागले, गरिबीतून उगवलेला कमळ होती ती. नेहमी शंकराच्या देवळात असायची. त्याची सेवा करतांनाच नारायण भेटला तिला. लग्न कर असे तीही त्याला कधी म्हणली नाही. कदाचित तिला त्याचे प्रेमच पुरेसे होते मात्र लग्नानंतरही नारायणाचे तिला भेटणे तिच्या जीवावर बेतले.
लोकांना अजूनही कधी दिसते मंदिराभोवती ती. हे कितपत खरे माहिती नाही मला. हो काका दिसते ती, यश बोलून गेला. पुढे तो म्हणाला काका ती केस झाली होती ना त्यात पाटीलासोबत आणखी कोण होते गुन्ह्यात.
पाटीलाची गडी माणसं, गेली ती पण. फक्त तो नारायणाच्या बहिणीचा नवरा ज्याने आग लावली तोच तेवढा सुटला. गेला तो पळून दुसऱ्या देशात.
शेवंतांच्या वडिलांनी तो घरी येउन धमकवतो अशी तक्रारही केली होती. शेवंता त्याच्या बरोबर यायला बधली नाही म्हणून तर त्याने पाटलाच्या मनात तिच्याबद्दल विष कालावले.
“जरा मला त्याचे नाव समजेल काय?” यशने विचारले .
“धीरेन नाव होते त्याचे”, काका बोलले
धीरेन भाई, यश चमकला. आता त्याला बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला होता. आईलाच का त्रास होतोय हे पण त्याला समजले होते आणि कसेही करून धीरेन भाईंना इथे आणणे तेवढेच गरजेचे होते.
भारतात येताना धीरेन भाई खूप आढेवेढे घेत होते आणि इकडे गावात तर ते आलेच नाहीत याची कारणही यशला समजले.
धीरेन भाई म्हणजे यशच्या वडिलांच्या कंपनीतले मॅनेजर !
तसही काळजी नको म्हणून यशने त्यांना इथले फारसे काही कळवले नव्हते ते बरेच झाले. यशने त्यांना त्वरित फोन लावला आणि महत्वाचे काम आहे त्वरित निघून या असेही सांगितले.
इकडे यश पुन्हा एकदा मंदिरात गेला. मंदिराच्या बाहेरच तो थांबला आणि बोलायला लागला, मी सांगितले होते यामागे काय आहे मी शोधून काढेन आणि मी ते काढले. सर्व काही दुसऱ्याच्या हाताने करून याने तुला आणि पाटलाच्या निष्पाप घराण्याला संपवले. त्याचे काय करायचे हे तूच ठरव, तो येतोय!!
अचानक देवळातल्या घंटा वाजल्या आणि तीच ओळखीची झुळूक त्याला स्पर्शून गेली. अगदी दूरवर त्याला ती जाताना दिसली.
धीरेन भाई येताच वाड्यापाशी त्यांची गाडी बंद पडली. त्यांनी यशला फोन लावला. मात्र यश आणि त्याची आई तर गावाबाहेर पण पडले होते आणि धीरेन वाड्याच्या दिशेने चालत होता, ती त्याला बोलवत होती...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा